औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही : शिंदे   

विजय चव्हाण

मुंबई : औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही करू नये. काँग्रेसने ही कबर संरक्षित केली होती. हा औरंगजेब कोणाचा कोण लागतो? तो महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी येथे आला. औरंगजेब हा लुटारू असून तो येऊन देवी-देवतांची मंदिरे मोडली. अनेक देशांनी आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या. तसे, आपणही केले असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, किंग एडवर्ड यांचे पुतळे काढत बदल केले. ज्याने महाराष्ट्रावर अनन्वित छळ केले, अशा औरंगरंजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिला. 
 
शिंदे यांनी काल नागपूर घटनेवर निवदेन दिले. ते म्हणाले, नागपूर महाल परिसरात विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक गवताची कबर जाळली. पण, त्यानंतर वेगळीच अफवा पसरवली गेली. त्यानंतर एक जमाव घोषणा देत रस्त्यावर उतरले. पोलिसांनी या जमावाला हटवले.  त्याच वेळी हंसापुरी भागात दगडफेक झाली. यात १२ दुचाकींचे नुकसान झाले, अशी माहिती शिंदे यांनी सभागृहात दिली. काहींवर शस्त्राने वार झाले तर काही घरांवर दगडफेक झाली. पुरोगामी महाराष्ट्राय अशा घटना योग्य नाहीत, असे शिंदे म्हणाले.
 
नागपूरमध्ये रात्री दोन-पाच हजारांच्या जमावाने पेट्रोल बॉम्ब फेकत हल्ला केला. हा हल्ला नियोजनबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले. पोलिस वाहनांवर हल्ले करण्यात आले. अग्निशमनचे वाहन पेटविण्यात आले, असेह ते म्हणाले. मोमीन पुरा, चिटणीस पार्क, हंस पुरी, महाल परिसरात दंगलसदृश स्थिती झाली होती. पोलिसांवर बाटल्या, दगड, विटा फेकण्यात आल्या, असेही ते म्हणाले.
 
शिंदे यांचा गौप्यस्फोट
 
उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटले. मला माफ करा. मी पुन्हा येतो, असे सांगितले, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात केला. तर अनिल परब यांच्याकडे बोट दाखवत  ’तुम्हाला नोटीस आली तेव्हा तुम्ही पण गेले होते. मला यातून सोडवा. तुम्हाला सोडवल्यावर तुम्ही इकडे येऊन तुम्ही ही पलटी मारली, असे शिंदे म्हणाले. 
 
नागपूर घटनेवर उपमुख्यमंत्री निवेदन करत असताना फडणवीस यांनी संभाजी महाजांप्रमाणे छळ केला असल्याचे परब बोलले होते. त्या विधानावर टीका करताना शिंदे परिषदेत बोलत होते. यामुळे गोंधळाला अधिक जोर आला होता. शिंदे म्हणाले की,  आम्ही जे केले ते खुलेआम केले असून लपून-छपून केले नाही. धाडस करायला वाघाचे काळीज लागते. तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल करताना परब तुमचा इतिहास मला माहित आहे, असे शिंदे म्हणाले. पक्ष प्रमुखांना काँग्रेस सोबत जाऊ नका, असे सांगितले होते. ठाकरे पक्षाने बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्चीसाठी औरंगरंजेबाचे विचार धरले. त्यामुळे हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याची टीका शिंदे यांनी केली. काँग्रेस सोबत जाऊन सत्ता मिळवली. ते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन याना कारागृहात टाकणार होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपचे आमदार घेणार होते.  मात्र, त्यांचा टांगा पलटी केला असल्याचे शिंदे म्हणाले.
 

Related Articles